महाकुंभ २०२५ : एक मैत्री पुर्ण अनुभव
भाग १


#Prayagraj #TriveniSangam #SpiritualJourney #SanatanDharma
महा कुंभ मेळ्याला जायचेच असा काही आमचा 'पण' नव्हता परंतु आलोच आहोत या भारत वर्षात जन्माला तर जाऊन एकदा डुबकी मारू असे ठरवले. जेव्हा मी महाकुंभ ला जातो असे जाहीररित्या सांगितले तेव्हा सर्वानी त्यास होकार दिला आणि सर्व पापे गंगेत सोडून ये असा आदेश दिला.
मग प्रश्न आला तो कि मी पाप कधी केल आणि का केल हा. बायको मुले म्हणाली कि आमच्या साठी तुम्ही पाप कधीच केलं नाही, आम्ही येणार नाही. नातेवाईक म्हणाले आमच्या साठी तू काहीच केले नाहीस तर पापाचा प्रश्न येतो कुठे आणि आम्ही तुझा खर्च का उचलायचा. आता राहिले मित्र, त्यांच्यासाठी तर पापांचे घडे भरले आणि त्यांनी ते मान्य हि केले.
मग काय, मित्रांना घेऊनच अमृत स्नान करायचे पक्के ठरवले आणि तयारीला लागलो. दोन चार व्हाट्सअप ग्रुप मध्ये "कोणी अंघोळीला येणार का, नदीला १४०० किमी लांब जायचे आहे" असा मेसेज टाकला आणि कोणी गळाला लागतो का याची वाट पाहत बसलो. काही मित्र म्हणाले 'आम्ही फक्त घरीच अंघोळ करतो', काही म्हणाले 'घरचे सोडणार नाहीत', बाकीचे म्हणाले 'घरून कपडे दिले तर येणार पण फुकट नेणार का? '. होय नाय करता करता एक पुण्याचा आणि दोन ठाण्याचे मित्र तयार झाले आणि मी कामाला लागलो.
चड्डी बनियन टॉवेलात गुंडाळून विहिरीवर अंघोळीला जाण्याचा अनुभव गाठीशी होता त्यामुळे तयारी करताना फारसा त्रास झाला नाही. पुण्याच्या मित्राने त्याच्या पुतण्याला आमची प्रयागराज मध्ये सोय कर म्हणून गळ घातली आणि आमची राहण्याची काळजी मिटली. घरच्याच वाहनाने प्रवास करायचा असल्यामुळे ते आतून बाहेरून धुऊन घेतले आणि तेल पाणी केले. पुण्याचा मित्र अकरा तारखेला रात्री मुक्कामाला आला आणि सकाळी उठून आम्ही नागपूच्या रस्त्याला लागलो. ठाणे नाशिक तसा पायाखालचा रास्ता आणि वाहनांची गर्दीही कमी , त्यामुळे इगतपुरी ला समृद्धी महामार्गाला जाणे झटकन झाले. साधारणतः सात तासाच्या नागपूर पर्यंत च्या प्रवासात एक तास गडकरी साहेबांना, देवा भाऊंना, शिंदे साहेबांना धन्यवाद देण्यात गेले. पुढचा एक तास सिमेन्ट च्या रस्त्यामुळे टायर कंपन्यांचे शेअर्स वर जातील का आणि आपण किती घ्यायला हवे यावर खर्च झाला. नंतरचा काही वेळ समृद्धी महामार्गावर हॉटेल कुठे टाकता येईल , मेनू काय ठेवायचा आणि आपल्यापैकी कोण चालवणार यावर विचार मंथन केले.
कसे काय ठाऊक पण आमच्यापैकी एकाला लक्षात आले कि आपण सिवनी ला मुक्काम कुठे करायचा हेच ठरवले नाही. मग काय , लगेच ऑनलाईन हॉटेल बुकिंग करून टाकले आणि नागपूर - जबलपूर रोडला लागलो . सात वर्षांपूर्वी मी तीन दिवस पेंच अभयारण्यात राहून आलो होतो म्हणून आता पेंच वरून जाताना फारशी भीती वाटली नाही. रात्री नवाला सिवनी ला पोहोचलो आणि लगेच हॉटेलच्या रूफटॉप वर जेवायला गेलो. उत्तम जेवण पण भूक मेल्यावर आणून दिले त्यामुळे आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असो.
सकाळी सिवनी बस स्थानाकच्या आजूबाजूला फिरून आलो, तर्री पोह्याचा आस्वाद घेतला आणि 'इंडियन कॉफी हाऊस' मध्ये चहापान केले. साधारणपणे नऊ वाजता प्रयागराज कडे प्रयाण केले. मारुती रायाचे चित्र असलेले भगवे झेंडे आपल्या चार चाकी आधुनिक रथावर लावून दक्षिण भारतातून बरेच लोक आम्हाला मागे टाकून वायुवेगाने जाताना पहिले आणि मन भरून आले. दुपारचे जेवण रेवा मधल्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये घ्यायचे म्हणून गाडी आतल्या रस्त्याला वळवली. अर्ध्या तासाच्या अथक शोधमोहिमेनंतर कळले कि गुगलने ५ रेटिंग दिलेले हॉटेल दोन वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. मग परत हायवे ला आलो आणि जेवण उरकले.
घरापासून ऑफिस पर्यंत प्रत्येकाचा यु ट्युबरचे रील बघून आम्ही ३०० किमी ट्रॅफिक मध्ये कसे अडकणार, ३० किमी कसे चालणार याचा आमच्या व्हाट्सअप वर भडीमार चालू होता. आम्ही प्रयागराज पासून २५ किमी पर्यंत पोहोचलो आणि चहा साठी ब्रेक घेतला. साहजिकच पुढे काय वाढून ठेवले असणार याची चिंता करत थोडी चौकशी केली तर् चहा वाला म्हणाला ४ किमी वर पोलीस गाड्या थांबऊन बाजूच्या शेतात पार्किंग करायला लावत आहेत. आता अंघोळीला जातो म्हणून घरातून निघालो तर होतो मग परत कसे जाणार.
निघालो, म्हंटले जे काही व्हायचे ते होईल, ५ किमी च्या पुढे गेलो , पोलीस चेक पोस्ट आले आणि गाडी सरळ त्यातून पुढे गेली, कोणी हात केला नाही, गाड्या अडवल्या नाहीत आणि ट्रॅफिक पण सुरळीत चालू होते. आता रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत चालली होती, कधीही पोलीस थांबवतील असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. लवकरच आम्ही मुख्य हायवे सोडून जुन्या नैनी पुलावर जाण्यासाठी वळलो. ईथे मात्र प्रचंड ट्रॅफिक होते, ई-रिक्षांची संख्या खूपच होती पण एंजिनाचा आवाज आणि धूर अजिबात नव्हता. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही पुलावर पोहोचलो, नैनी पूल हा दीडशे वर्ष जुना असून तो डबल डेकर आहे, वरून भारतीय रेल्वे जाते आणि खालून वाहनांसाठी सोय केली आहे. चार वर्षांपूर्वी या पुलाची डागडुजी केलेली आहे आणि तो चांगल्या स्थितीत आहे. नदी पार करायला आम्हाला २० मिनिटे लागली आणि आम्ही मुक्कामाच्या रस्त्याला लागलो.
- चं दे